• पालक मेळावा

शिक्षणाचा रथ हा दोन चाकांवर चालतो आहे. एक चाक गुरुकुलातील विद्यार्थी व कार्यकर्ते, तर दुसरे चाक पालक आहेत.भारतीय समाजरचनेत कुटुंबाला फार महत्व दिलेले आहे. विद्यार्थी व पालक यांचे अतूट व विशेष नाते असते. म्हणून गुरुकुलातील शिक्षण आणि व्यवस्थापन या मध्ये पालकांना विशेष स्थान असते.

‘पालक मेळावा’ म्हणजे पालकांचा मेळावा किंवा सभा. हा कार्यक्रम वर्षातून एकदा असतो. एकूण दोन दिवसांमध्ये विविध सत्र व उपक्रमांचे आयोजन केलेले असते.

पालक मेळाव्याचे उद्देश:

  1. पालकांना विद्यार्थ्यांच्या जडन-घडनीचा भाग बनवणे.
  2. कार्यकर्ते व विद्यार्थ्यांच्या कला-गुणांसाठी व्यासपीठ मिळणे.
  3. शिक्षणाची दिशा काय असावी या संदर्भात विचार-विनीमय होणे.

स्वरूप:

पालक मेळावा कार्यक्रम दोन दिवसांचा असतो. या साठी 100% पालक उपस्थित असतात. पालक मेळाव्यामध्ये खालील सत्र व कार्यक्रम होतात.

    • परिचय सत्र:
      • पालक, विद्यार्थी व कार्यकर्ते एकमेकांना स्वत:चा परिचय करून देतात. 
    • गुरुकुलाचा वार्षिक आढावा:
      • गुरुकुलातील कार्यकर्ते व विद्यार्थी गुरुकुलात मागील वर्षात काय-काय झाले? याचा अढावा पालक व शिक्षणप्रेमीं समोर मांडतात.
      • विद्यार्थी स्वत:चा शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकास काय झाला हे मांडतात. याचे प्रात्यक्षिक सुद्धा होतात.
    • गटचर्चा:
      • पालक, विद्यार्थी व एक कार्यकर्ता असे गट करुन त्यांच्या मध्ये चर्चा होते.
    • मुक्तचिंतन
      • सर्वजन मिळून शिक्षणाची दिशा व गुरुकुलाचे व्यवस्थापन याच्याशी संबंधीत चर्चा करतात.
      • चर्चेमध्ये गुरुकुल समितीचे अधिकारी प्रश्नांना उत्तरं देतात. तसेच नवीन सुझावांचे स्वागत करतात.
    • शारीरिक प्रात्यक्षिक
      • विद्यार्थी विविध शारीरिक प्रात्यक्षिक करतात.
      • पालक व शिक्षणप्रेमींसाठी खेळ घेतले जातात.
    • सांस्कृतिक कार्यक्रम
      • विद्यार्थी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात.
  • आनंद वर्ग

गुरुकुलबाह्य विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांमध्ये 10 दिवसीय शिबीर म्हणजे आनंद वर्ग होय. सुट्टी हा मुलांसाठी एक मूल्यवान भेट असते. या सुट्टीत चार भिंतीच्या शाळेतून, त्याच त्या ट्युशन व दररोजच्या दिनक्रमातून बाहेर पडून मनसोक्त आनंद लुटावा असे मुलांना वाटत असते. याच बरोबर काही सृजनशील निर्मितीचा आनंद, निसर्गाचा निखळ सात्विक सहवास , डोंगर माथ्यावर टेहाळणे, पोहणे याचा अनुभव. विविध पक्षी-प्राणी, झाडं-पानं, फुलं यांचा सहवास. याचा अंतर्भाव आनंद वर्गामध्ये होतो.

आनंद वर्गाचा उद्देश:

1. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा व यातून सृजनशील निर्मिती व्हावी.

2. पोहणे, ट्रेकिंग, कराटे याचे प्रशिक्षण व आनंद मिळावा.

3. मुलांनी निसर्गाच्या अधिक जवळ जावे.

4. स्वावलंबन, श्रमसंस्कार, गट-कार्य (ग्रुप-वर्क), नेतृत्व अशा गुणांची वृद्धी करणे.

स्वरूप:

एका तुकडीत 5वी ते 10 वी वयोगटातील 100 मुले-मुली असतात. हे शिबीर दहा दिवसांचे असते. याच्या आयोजनामध्ये गुरुकुलातील अनुभवी कार्यकर्ते व काही विशेष तज्ञ असतात. गुरुकुलातील आनंद वर्गामध्ये प्रामुख्याने विविध उपक्रम होतात.

  • पं. दीनदयाळजी व श्र. नानाजी जयंती

पं. दीनदयाळ उपाध्याय व श्रद्धेय नानाजी या महान विभूतींची जयंती गुरुकुलात विविध पद्धतीने साजरी केली जाते.

या आंनदोत्सवाचे दोन प्रमुख उद्दिष्ट्ये असतात.

    1. पं. दीनदयाळजी व श्र. नानाजी यांच्या विषयी सर्वांना माहीती व्हावी.
    2. विद्यार्थी व कार्यकर्ते यांच्या विशेष सुप्त गुणांना वाव मिळावा.

हे उद्दीष्ट्ये समोर ठेऊन विविध सत्र, उपक्रम व स्पर्धांचे आयोजन पूर्ण सप्ताहभर केले जाते.

  • गुरुपौर्णिमा

गुरुकुलाचा आरंभ 21 जुलै 1986 ला गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला आहे. गुरुकुलाचा वाढदिवस व गुरुपौर्णिमा ची अभिव्यक्ती म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.

या दिवसाचे निमित्त करुन मागील वर्षाचे सिंहावलोकन केले जाते.आपली दिशा व दशा बघण्यासाठी या दिवसाचा खूप उपयोग होतो.

गुरुपौर्णिमा दिवसी सकाळी गुरुपूजनाचा कार्यक्रम होतो. गुरू प्रतिकात्मक ग्रंथ असतात. याच बरोबर नेमके गुरुपौर्णिमा म्हणजे काय? नेमके गुरु म्हणजे काय? कोणी व्यक्ती म्हणजेच गुरु की गुरु एक तत्व? अशा मुद्द्यांवर चर्चा होते व गुरुपौर्णिमेच्या मागची संकल्पना स्पष्ट केली जाते. या नंतर स्वेच्छेने गुरुदक्षिणा देऊन, प्रसाद घेऊन कार्यक्रम संपतो.

  • सहल

सहल हे शिक्षणातले प्रभावी माध्यम आहे असे मानले जाते. सहलीच्या माध्यमाने आनंदाने व सहजतेने व्यक्ती सहज खूप शिकत असतो. गुरुकुलामध्ये सहलीला विशेष स्थान दिलेले आहे. गुरुकुलातील सहलींबद्दल काही ठळक वैशिष्ट्ये: –

वर्षातून दोन सहलींचे आयोजन केले जाते: 1) एक दिवसीय पावसाळी, 2) 3 ते 5 दिवसीय सहल.

एक दिवसीय पावसाळी सहल ही मराठवाडा भागातील एखादे प्रेक्षणिय स्थळ अथवा शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त प्रकल्पाला भेट असते.

– 3 ते 5 दिवसीय सहल ही द्वितीय सत्रात (दिवाळी नंतर)असते.

– महाराष्ट्रातील विशिष्ट भूभाग प्रत्येक सहलीत पाहीला जातो.

– ऐतिहासिक, भौगोलिक स्थळाबरोबर काही शैक्षणिक व औद्योगिक स्थळांना देखील भेटी दिल्या जातात.

– सहलींसाठी बसेस राज्य परिवहन मंडळाच्याच वापरल्या जातात.

– सहलींचा जास्तीत जास्त खर्च पालक करतात. या बरोबरच गुरुकुल स्नेही संस्था व व्यक्ती विविध स्वरूपात मदत करत असतात.

– विशेष सहली: दिल्ली व मध्यप्रदेशातील चित्रकुट परिसर. या सहलींचे आयोजन रेल्वे द्वारे केले होते.

  • आरोग्य तपासणी शिबीर (Health check-up camp)

    बीड जिल्ह्यातील अरोग्य तज्ञ (डॉक्टर) एक दिवसासाठी गुरुकुलात येऊन सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करतात. नंतर गुरुकुलातील कार्यकर्ते  या विद्यार्थ्यांच्या उपचाराची काळजी घेतात.